Saturday 11 December, 2010

स्वप्नवत

कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार यांना  त्यांच्या युरोप दौर्‍यावर एक होतकरू किंबहूना आपली स्वप्न सत्यात आणलेला एक तरूण भेटला. त्याच्या त्या भेटीचं वर्णन भारलेल्या शब्दात ( http://www.myniti.com/2010/12/tweet_10.html)  पोतदार यांनी केलं आहे. आपल्यालाही ते नक्कीच आवडेल. वाचा: 

My Photo९ डिसेंबर २०१०: पॅरिसच्या आयफेल टॉवरचे मी माझ्या ब्लॅकबेरीवर फोटो घेतले आणि बस मधे शिरताना नजर एका भारतीय वाटणाऱ्या सावळ्या तरूणाकडे गेली.   मला तो चेहरा फारच परिचयाचा वाटला, मनात म्हंटल असेल कुणीतरी.  बस सुरु झाली आणि दोन मिनीटात मागुन आवाज आला "Are you Indian"  त्या भारतीय दिसणाऱ्या तरूणाने मला विचारलं.  मी म्हटंल येस.  तो पटकन माझ्या रिकाम्या असलेल्या बाजुच्या सीट वर येउन बसला.  हॅलो म्हणत मी  हॅन्ड शेक साठी हात पुढे केला.   मी म्हणालो What about you?  मोठ्या स्माईलने तो म्हणाला "I am Shrinivas Kulkarni!  "कुलकर्णी म्हणजे तु मराठी आहेस?  अरे मग मराठीत बोलुया."  मी आनंदात त्याला सांगितलं.  'सर मी म...रा.ठी आ...हे प्प...ण म..ला...जा...स.त.. बो..ल..त.ता...ये..त..न.ना.ही.’  त्याने तुटक शब्दात सांगितल.  Which part of the India you come from? मी विचारलं.   "I am from Dharwad a place from Karnataka, me and my wife speak fluent Tamil"  "In fact I can speak 13 foreign languages, but not Marathi."  तो सांगत होता.  "Sir I am really happy to meet you because I am realy bored.  Since last 7 days there is no one to talk"  तो म्हणाला.   "How long are you going to be in Paris?"  मी विचारलं.   "For one month.  Paris is the headquarters of my present Job and I head the  ITSM & Quality for Sodexo Globally"  श्रीनिवास ने सांगितलं.  Sodexo group च्या  आयटी आणि क्वालिटी कंट्रोलचा हेड एक मराठी तरूण.  मला खुपच त्याचा अभिमान वाटला.    "Congratulations!   which means you are the boss!'  मी त्याच्या पाठीवर हात ठेवतं म्हटंल.   त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावेना.  "I am really pround of you my dear!"  मी पुन्हा त्याची पाठ थोपटली कारण मला खरचं त्याचा अभिमान वाटला.   "How come you don’t speak Marathi?" मी कुतुहुलाने पुन्हा त्याला विचारलं.  "At home we speak Tamil for generations, I speak Marathi but not fluently, also because I have been travelling ever since I passed out my college."    त्याचं कर्तृत्व बघुन मी त्याच्या भाषेच्या जास्त खोलात जायचं नाही अस ठरवलं आणि आम्ही बोलत सुटलो....

आम्ही दोन दिवसांच सिटी टुर बसचं तिकीट घेतलं होतं मग जवळपास अर्धा दिवस आम्ही मनसोक्त पॅरिस फिरलो.  गलेरी लफायत  य़ा पॅरिसच्या सगळ्यात मोठ्या मॉलला भेट दिली.  नंतर दोघांनाही खुप भुक लागली होती.   मी म्हटंल चल जवळच जेवायला जाऊया.   "मी नॉन वेज खात नाही, आपण इथं असलेल्या "सरवणा-भवन" ला जाऊया जवळच आहे,  ट्युब ट्रेन ने तर १५ मिनीटे लागतील."  श्रीनिवासने सांगितलं.   नॉन वेज खात नाही म्हटंल्या वर मी जरा गोंधळलोच.   म्हटंल चल तुझी मर्जी.   पटकन  आम्ही  सरवणाभवन गाठलं, तु काय घेणार मी विचारलं - सर साऊथ इंडियन थाळी, तुम्ही - मी म्हटंल पंजाबी (मराठी थाळी हा प्रकार जगात अजुन जायचा आहे!).    बाहेरची थंडी आणि पोटातली अग्नि शांत झाल्यावर - म्हणजे थोडं जेवल्यावर स्वत:ला सावरत मी त्याला विचारलं तुझ वय काय आहे बॉस?  तो म्हणाला गेस - मी म्हटंल ४०, आणखी एक चान्स मी म्हटंल ३५.  मी फक्त २८ वर्षाचा आहे!  - श्रीनिवास.  काय सांगतो?  खरचं सर मी वयाच्या फार लवकर कामला लागलो.   माझं मलाच समजेना की इतक्या लहान वयात माणुस इतका मोठा कसा होऊ शकतो?  इतका प्रोग्रेस कसा केलास मी कॅफी घेत त्याला विचारलं.  "It is not difficult sir.  once you decide to work hard then you must really work hard"  त्याने यशाची साधी व्यख्या मला सांगितली.  "Sir I run my blog titled "Live Life to the FULLEST" web address is  http://www.shrinivaskk.blogspot.com/.  Recently I posted an article on 'Excellance', I began by asking What matters for success Skill or Attitude?  मी म्हटंल "Attitude",  सर यहीं तो लोग समझते नही ना! और दु:खी होते है!   श्रीनिवास म्हणाला (त्याचं हिंदी बर आहे).   Ok Lets tweek this Is excellance a skill or attitude?  मी पुन्हा म्हणालो Attitude!  Sir Great.  मग आम्ही Success, Attitude, आणि Excellance या माझ्या आवडत्या विषयांवर एक तास नॉन स्टॉप बोलत होतो........खुपच बरं वाटलं.   इतक्या लहान वयात विचारांची झेप बघुन मी थक्क झालो.  "I have no words to describe you my dear!"  मी पुन्हा त्याची पाठ थोपटली.   मी म्हटंल आपल हे बोलण माझ्या ब्लॉग वर टाकतो, तो नम्रपणे म्हणाला "सर I am really not that great!",   मी म्हटंल Boss let my readers decide!   "अरे सरजी please dont embarass me."   शेवटी तो म्हणाला Sir I remember the dialogue from 3 idiots, where Chanchad baba says “Strive for Excellence, Success will automatically fall at your feet”.  I am trying my best.....

एव्हाना स्नो फॉल सुरु झाला होता, थंडी खुपच वाढली.  दिवसभर त्याने माझे  आग्रहाने फोटो  काढ्ले आणि  इमेलवरून पाठवीन म्हणाला.   मला वाटतं तुम्ही त्याची साईट बघा आणि त्याने लिहिलेले सगळे ब्लॉगस जरुर वाचा...उशीरपण झाला होता.   आम्ही एकमेकांना पुन्हा मुंबईला भेटण्याचे आश्वासन देऊन निरोप घेतला.  

आयफेल टॉवर खाली भेटलेला हा असा २८ वर्षीय यशस्वी मराठी तरूण श्रीनिवास कुलकर्णी  - खोल विचारांचा, मोठ्या मनाचा, मेहनती आणि सतत आनंदी.    श्रीनिवासच्या कर्तृत्वाची उंचीचा विचार केल्यावर आयफेल टॉवर मला खुपच लहान वाटला.............आणि मनात पुन्हा म्हटंल श्रीनिवास I am proud of you my dear!


नितीन पोतदार 

Monday 29 November, 2010

स्वप्नांपलीकडची दिवाळी!


बदलता भारत , बदलते विश्व या सदरात मालदीवमधले भारताचे उच्चायुक्त श्री. ज्ञानेश्वर मुळे दर पंधरा दिवसानी भारतीय मनाला उभारी आणणारे लेख लिहित असतात. मालदीवला उच्चायुक्त म्हणून गेल्यापासून त्यांनी मालदीवसाठी आणि आपल्या भारतदेशासाठी भारीव अशी कामगीरी केली आहे. एखादा सरकारी अधिकारी आपल्याच देशात नव्हे तर पदेशातही जावून किती उत्तम काम  करू शकतो याचं हे खुप चांगलं उदाहरणर आहे. त्यांनी स्वप्न पाहिली आणि आता ती सत्यात येताना आपण पहात आहोत. स्वप्न सत्यात येतानाचा हा प्रवास खास 'स्वप्नपंख' च्या वाचकांसाठी  लोकसत्ताच्या सौजन्याने.   



स्वप्नांना मी ‘उमलू नकाच केव्हा’ असे कधीच सांगत नाही. अपूर्णतेची गोडी कवितेत ठीक आहे, प्रत्यक्षात पूर्णतेकडची झेप महत्त्वाची. जपानी कुंभार आपली मडकी विश्वास बसू नये इतकी परिपूर्ण बनवितात आणि मग ती ओली असतानाच एखाद्या ठिकाणी बोटाने हलकेच दाबून तिला अपूर्णतेची गोडी चिकटवितात. स्वप्नांची बाग सतत फुलवत ठेवणं, तिला अधिकाधिक संपन्न बनविणं महत्त्वाचं आहे. मीही सतत नव-नव्या स्वप्नांच्या शोधात असतो आणि भविष्यासाठी मी स्वप्नांचा एक गुच्छ तयार ठेवला आहे. त्यात मालदीवमधल्या साहित्य संमेलनापासून मला भारतात लवकरच सुरू करायच्या शैक्षणिक संस्थेपर्यंत अगणित स्वप्नांचा समावेश आहे.
मकरंद चुरी यांनी ऑगस्टमध्ये मालदीवच्या कृषीमंत्र्यांना लिहिलेल्या ई-मेलचा शेवट असा केला आहे, ‘प्रवास तर सुरू झाला आहे; पण रस्ता खूप दूरचा आहे! मला या वाक्याची गंमत वाटली आणि मकरंद चुरींचा आतापर्यंतचा मालदीवमधला प्रवास आठवला. फेब्रुवारी २०१० मध्ये त्यांचा पहिला मेल आला. ७ फेब्रुवारीच्या ‘लोकसत्ता’तील ‘आपण सगळेच मालदिवी आहोत’ या माझ्या लेखावर त्यांची दीर्घ प्रतिक्रिया होती. तिचा सारांश असा- ‘तुमचे अनेक लेख पूर्वी वाचलेत; पण हा लेख मला, पत्नी अंजलीला व मुलगी सायलीला खूपच प्रभावित करून गेला. तुमच्या लेखांतून तुम्ही आम्हाला थेट मालदीवला नेलंत. तुमचा लेख वाचताना अंजलीच्या आणि माझ्या डोक्यात एक विचार आला तिथल्या तुम्ही उल्लेखिलेल्या एक हजार बेटांवर फळझाडं लावली तर? तिथल्या लोकांना पीक व पैसा दोन्ही मिळेल. शिवाय काही दुर्लभ भाज्या ज्यांची पंचतारांकित हॉटेल्सना गरज असते त्यांचेही पीक घेऊ. तिथून निर्यात करता येईल. ऑरगॅनिक भाज्या केल्याने कार्बन क्रेडिटही मालदीवला मिळेल. वाळूच्या जमिनीत अस्कारागससारख्या भाज्या फार चांगल्या येतात. फार छान स्कोप आहे या सर्व गोष्टींना.
चुरींनी त्या मेलमध्ये त्यांची स्वत:ची पाश्र्वभूमी सांगितली होती. भारतात २०-२५ वर्षांपूर्वी पंचतारांकित हॉटेलांना लागणाऱ्या भाज्या व फळे आयात केली जात असत. चुरींनी आधुनिक शेतीचे तंत्र वापरून शेतकऱ्यांना सामील करून अशा उंची भाज्या व फळांच्या उत्पादनाचे काम सुरू केले आणि आज भारतात अशा हॉटेलांसाठी फळे व भाज्या आयात करण्याची गरज संपली. एका अर्थाने चुरी व त्यांचे कुटुंबीय ‘क्रांतिकारक’ आहेत. त्यांना दिलेल्या उत्तरात मी त्यांना मालदीवला भेट देण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते व अंजली दोघे आले. येताना मालदीवमधल्या कृषी उत्पादनाची स्वत:च्या अभ्यासावर आधारित अशी संकल्पना घेऊन आले. स्वत:बरोबर काही बिया, काही रोपटी, काही भाज्या व फळेही घेऊन आले. त्यांच्यासाठी मी काही शेतकरी (होऊ घातलेले) शोधून ठेवले होते. त्यांनी मालदीवमध्ये केलेले प्रयोग असे होते. मीधू आणि हुळुदू या जोड बेटांवरील शेतकऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक शेती पीकपद्धती यांचा अभ्यास केला. पाणी, माती व हवामानाचा अभ्यास करून काही भाज्या व फळांची रोपे लावली. शेतकऱ्यांना बिया देऊन त्यांना पिकाची निगराणी, पाणी आणि उत्पादन यांच्यातील बारकावे समजावून सांगितले. उत्पादनं बाजारापर्यंत कशी पोहोचविता येतील याचे रिसॉर्टवरील लोकांना बोलावून त्यांच्यासमोर मार्गदर्शन केले. रिसॉर्टवरील आचाऱ्यांना त्यांच्या गरजा काय असतात ते शेतकऱ्यांना सांगायला लावले. शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले तर सगळे किती सहज शक्य आहे हे पटवून दिले.
एका आठवडय़ात चुरी दाम्पत्याने केलेले काम शब्दांपलीकडचे होते. कर्तृत्ववान माणसे कामाने बोलतात याचं प्रात्यक्षिकच त्यांनी दिलं. त्यांना आता मालदीव सरकारच्या वतीनं कृषी विशेषज्ज्ञ म्हणून पाचारण केले जाईल. मी एक सरकारी अधिकारी आणि ते दोघे शेतीतज्ज्ञ असले तरी आमच्या तिघांच्या डोळ्यातील स्वप्न एकच आहे. भारतीय मदतीनं मालदीवमध्ये मळे फुलवायचे. तिथल्या चमचमत्या वाळूवर हिरव्या पिकांचे गालिचे पडू देत आणि तिथल्या झाडांना फळांचा भार असह्य होऊ देत! स्वप्नांचे आणि स्वप्नपूर्तीचे मला वेड आहे. प्रत्येक नवीन भेटणाऱ्या व्यक्तीत मला स्वप्नांच्या नवीन शक्यता दिसतात. माणसांबरोबरच नवे विचार, नव्या कल्पना, नव्या घटना खरं तर प्रत्येक नवा दिवस स्वप्नांचे सूपभर मोती माझ्यावर उधळतो आणि कोणते वेचू, कोणते नको, अशा गोंधळात जीव हरखून जातो. हातात आलेल्या स्वप्नांचा पाठलाग हेच माझे जीवन आहे.
मालदीवला यायच्या आधी मालदीवविषयी बरेच वाचले. त्या वाचनात इतकी नवनवीन स्वप्नं सजवली, की इथे येताना स्वप्नांची एक प्रचंड सूटकेसच बरोबर घेऊन आलो आणि गेली दीड र्वष संधी मिळेल तसं स्वप्नांचं हे बी पेरायचं काम करतो आहे. प्रत्येक स्वप्नाचं बीज वेगळ्या पद्धतीनं रुजतं, त्याला वेगळी खतं आणि वेगवेगळी निगरानी लागते. प्रत्येक रोप वेगळं. त्याची वाढण्याची तऱ्हा वेगळी आणि त्यामुळं मनाला मिळणाऱ्या समाधानातील विविधताही वेगळी. आता मालदीवला येऊन बरोबर दीड र्वष झालं. वेगवेगळ्या टप्प्यात असणारी ही स्वप्नपूर्ती पाहताना एका वेगळ्याच नशेचा अनुभव मी घेतो आहे.
एप्रिल २००९ मध्ये मालदीवला येण्याआधी नागरी विमान खात्याच्या सचिवांना मी भेटलो होतो. चर्चेत ते म्हणाले, की माले आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामाच्या स्पर्धेत जीएमआर या भारतीय कंपनीला अपात्र ठरविण्यात आलं होतं. झालं! ते वाक्य आणि तो विषय तिथंच संपायला हरकत नव्हती; पण माझ्या मनाच्या खिडकीतून एक छोटे स्वप्न डोकावून पाहू लागले, मी लगेच जीएमआरच्या दिल्ली कार्यालयाशी संपर्क साधला. रवींद्रन आणि नायर यांच्याकडून अयशस्वी प्रयत्नांची माहिती घेतली. मालदीवला रुजू होताच काही आठवडय़ात स्थानिक मंत्री, अधिकारी वगैरेंशी चर्चा केली. जीएमआरसारख्या कंपनीला अपात्र ठरविण्यामागच्या तर्काला मी आव्हान दिलं आणि जीएमआरला मालदीवमध्ये संधी देणं मालदीवच्या हिताचं आहे, हे मनात रुजविलं. वारंवार प्रयत्न केल्याने, एकदा तरी जीएमआरशी चर्चा करून नेमकं कसं पुढं जाता येईल यावर चिार करण्यासाठी त्यांची मान्यता मिळविली. त्यानंतर मी जीएमआरशी संपर्क साधला आणि त्यांना मालदीवला प्रतिनिधी मंडळ पाठविण्याची विनंती केली; पण आता जीएमआरला प्रकल्पात रुची नव्हती. माझ्या मनात भारतीय कंपनीने मालदीवमध्ये बांधलेल्या भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळाचे स्वप्न रुजलेले होते; पण जीएमआरच्या इच्छेचे रोप केव्हाच कोमेजून गेले होते. विमानतळ बांधून ते चालविण्याचा अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या भारतात नाहीत. जीएमआरने दिल्ली व हैद्राबाद (आणि नंतर इस्तंबुल) ही विमानतळे बांधली असली तरी विमानतळावरील वाहतूक हाताळण्याचा त्यांचा अनुभव अपुरा होता म्हणून त्यांना अपात्र घोषित केले होते. या समस्येवर तोडगा काढायचा माझा प्रयत्न होता. मालदीव सरकारबरोबरील माझ्या अथक चर्चेचा परिणाम म्हणून अतिउत्तरेकडील हानीमाधू हे विमानतळ भारतीय कंपनीला देण्याचे त्या सरकारने तत्त्वत: मान्य केले होते; पण मी अनेकवार प्रयत्न करूनही आणि त्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाद्वारे प्रयत्न करूनही जीएमआरकडून प्रतिसादच नव्हता.
असेच चार-पाच महिने गेले. माझी अस्वस्थता वाढू लागली. मी सरळ विमान वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना फोन करून एकदा तरी जीएमआरला मालदीवला येऊ द्या, त्यानंतर काय करायचे ते त्यांना ठरवू दे, असा निर्वाणीचा इशारा दिला. माझ्या या प्रयत्नांची दया येऊन सचिवांनी ‘मी त्यांना पाठवितो’ असे आश्वासन दिले. त्यानंतर काही आठवडय़ांनी संध्याकाळी माझा फोन खणखणला. नाव दिसत नव्हते. ‘मी श्रीपती, सीईओ, जीएमआर हैदराबाद..’ सचिवांनी आपले आश्वासन पूर्ण केले होते.
२ ऑक्टोबर २००९ ला श्रीपती मालदीवला आले. गांधी जयंतीच्या दिवशी. मी माझ्या कार्यालयाच्या भिंतीवरचा मालदीवचा नकाशा त्यांना दाखविला. कुठे कुठे भारतीय गुंतवणुकीने बांधली गेलेली विमानतळे पाहणे माझे स्वप्न आहे ते सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांना उत्तरेकडचा हानीमाधू विमानतळ दाखवला. श्रीपतींनी जेव्हा तिथला समुद्र, तिथली धावपट्टी, त्या सुंदर बेटावरची झाडी आणि फिकट सोनेरी वाळू पाहिली तेव्हा ते बोलले, ‘आता माझ्या डोळ्यांनी मी तुमचे स्वप्न पाहतोय’ हानीमाधूला भारतातून विमानसेवा सुरू झाली तर दोन देशांतील अंतर एका तासाऐवजी पंचवीस मिनिटे होईल या माझ्या विचारामागचा अर्थ त्यांना कळला.
त्यानंतरच्या एका महिन्यात प्रचंड धावपळ झाली. ५ नोव्हेंबर २००९ ला (माझ्या वाढदिवसानिमित्त) जीएमआर व मालदीव सरकार यांच्यात पहिला समझोता झाला. त्यानंतर काही महिन्यात राजधानी मालेजवळच्या विमानतळाचे दरवाजेही उघडले. २८ जून २०१० ला मालदीव सरकार आणि जीएमआर यांच्यात माले विमानतळासाठी करार झाला. एक नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ, आर्थिक व व्यापारी केंद्र यांचे बांधकाम व व्यवस्थापन २५ वर्षांसाठी जीएमआर करील. माले प्रकल्पाचे काम नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात सुरूही झाले. माझे छोटे स्वप्न.. त्यातून छोटी धडपड आणि त्यातून जन्मली मालदीवमधली सगळ्यात मोठी गुंतवणूक आणि मालदीवच्या इतिहासातील सगळ्यात भव्य प्रकल्प. कधी कधी सहज विचार येतो.. जीएमआरचा पाठपुरावा मी सहा-सात महिने केला, तो मध्येच सोडला असता तर..
या प्रकल्पात मला थोडाफार त्रासही झाला. मालदीवमध्ये या प्रकल्पावर राजकीय टीका,  संसदीय गदारोळ, वृत्तपत्रीय हल्ले आणि न्यायालयातील प्रकरणे यांच्याबरोबरच धमक्याही वाटय़ाला आल्या; पण आम्ही शांतपणे या प्रक्रियेला तोंड दिले. या प्रकल्पाचं आपल्या देशासाठी असणारं महत्त्व समजायलाही काही र्वष लागतील; पण स्वप्नपूर्तीच्या आनंदाला मात्र सुरुवात झाली आहे.
गेल्या दीड वर्षांत विविध रंगांच्या विविध आकारांच्या अनेक स्वप्नांना मी मूर्त रूप दिले आहे. मालदीवमधील सन २००८ साली झालेल्या लोकशाहीच्या आगमनाचा ‘स्वप्नं बघण्याची सुवर्णसंधी’ असा अर्थ घेतला. स्वप्नं बघण्यासाठी आणि स्वप्नं जगण्यासाठी माणसाचा जन्म असतो; पण स्वप्नांनाही सुपीक जमीन लागते आणि कसणारे हात. 
गेल्या दीड वर्षांत मी जी स्वप्नं जगलो त्यांची यादी करणं कठीण आहे. प्रत्येक प्रकारच्या क्षेत्रात मी स्वप्नांची पखरण करून टाकली. आर्थिक क्षेत्रात विमानतळांबरोबरच शालेय व्यवस्थापन, संगणक प्रशिक्षण, विद्यापीठ स्थापना, प्रवासी रिसॉर्ट, अक्षय ऊर्जा, गृहबांधणी अशा जवळजवळ सगळ्या क्षेत्रात भारतीय प्रकल्पांची लागवड केली आहे. एनआयआयटी, टाटा उद्योग, श्रीराम, जीएमआर, सुझलॉन वगैरे नामवंत तशाच अनेक नवनवीन कंपन्यांनाही मालदीव प्रवेशात यश आले. 
सांस्कृतिक क्षेत्रातही दोन वर्षांपूर्वी केवळ अशक्य मानले गेले असते असे अनेक पुढाकार घेतले. मालदीवमध्ये भारतीय समारंभात ‘दीप प्रज्वलन’ नव्हते, त्याची सुरुवात केली (कुराण पठणही होतेच होते आणि अजूनही आहे) सुरुवातीला शंभर टक्के मुस्लीम देशात दीप प्रज्वलन हा ‘संवेदनशील’ विषय ठरला. शेवटी एका मालदिवी अभ्यासकाकडून, दीप प्रज्वलन हा भारताच्याच नव्हे तर मालदीवच्या परंपरेचा भाग आहे, असे सिद्ध करविले. आता राष्ट्राध्यक्षांपासून सगळेच दीप प्रज्वलन आनंदाने करतात. होळीपासून दिवाळीपर्यंत सगळे उत्सव आम्ही आता पहिल्यांदाच साजरे करताहोत. लवकरच भारतीय सांस्कृतिक केंद्रही इथे उघडले जाईल आणि सतारीचा झंकार, तबल्याची थिरक, रागमाला, योग, भारतीय भाषा, भारतीय सिनेमा सगळ्यांचा या देशाला परिचय होईल.
फक्त आर्थिक गुंतवणूकच नव्हे तर सांस्कृतिक गुंतवणूकही वाढते आहे. पर्यटन क्षेत्रातही भारतीय गुंतवणूक येत आहे. ‘मेक माय ट्रीपने’ मुंबई ते (मालदीवचे अति दक्षिणेचे) ग्यान विमानतळ, अशी चार्टर विमानसेवा तीन दिवसांच्या पॅकेजसह माफक दरात सुरू केली आहे. बेंगळुरूहून पाच दिवसांऐवजी आता दररोज विमानसेवा उपलब्ध आहे. या देशातील पहिली साहित्यिक संस्था आम्ही सुरू केली. इथल्या भारतीयांसाठी मोफत हिंदी, तमीळ, मल्याळी व दिवेहीचे वर्ग सुरू केले. प्रत्येक नोंदणीकृत भारतीयासाठी माफक दरात विम्याची योजना अंमलात आणली. अडचणीत असलेल्या मजुरांसाठी आसरा, आर्थिक मदत आणि भारतात परत पाठविण्याच्या ‘कल्याण’ योजनांचा प्रारंभ केला. या देशातील तुरुंगात खितपत पडलेल्या प्रत्येक भारतीय कैद्याला स्वतंत्र भेटलो, त्यांची कहाणी ऐकली आणि सोळापैकी चार जणांची सुटका करविली. बाकीच्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. 
उच्चायुक्त कार्यालय, भारतीय आणि स्थानिक लोकांना आपलेसे वाटेल, असे वातावरण तयार केले. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण तयार केले. प्रत्येकाच्या अभिव्यक्तीला संधी मिळावी म्हणून भारतीय समुदायासाठी अनेक कार्यक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक समारंभ यांचे नियमित आयोजन सुरू केले. या सर्व उपक्रमांद्वारे मरगळलेल्या भारतीय समाजात नवे चैतन्य आणले आणि भारत-मालदीव संबंध एका नव्या वरच्या पातळीवर पोहोचविले. स्वप्नांची सतत पेरणी, निगराणी आणि मळणी यांच्यामुळे आनंदाचे कोठार धनधान्याने भरून वाहते आहे.
स्वप्नांना मी ‘उमलू नकाच केव्हा’ असे कधीच सांगत नाही. अपूर्णतेची गोडी कवितेत ठीक आहे, प्रत्यक्षात पूर्णतेकडची झेप महत्त्वाची. जपानी कुंभार आपली मडकी विश्वास बसू नये इतकी परिपूर्ण बनवितात आणि मग ती ओली असतानाच एखाद्या ठिकाणी बोटाने हलकेच दाबून तिला अपूर्णतेची गोडी चिकटवितात. स्वप्नांची बाग सतत फुलवत ठेवणं, तिला अधिकाधिक संपन्न बनविणं महत्त्वाचं आहे. मीही सतत नव-नव्या स्वप्नांच्या शोधात असतो आणि भविष्यासाठी मी स्वप्नांचा एक गुच्छ तयार ठेवला आहे. त्यात मालदीवमधल्या साहित्य संमेलनापासून मला भारतात लवकरच सुरू करायच्या शैक्षणिक संस्थेपर्यंत अगणित स्वप्नांचा समावेश आहे.
दिवाळीत आपण नाचतो, बागडतो, फटाके उडवितो, फराळ खातो, मिठाई वाटतो. मला फुलबाज्या, भुईनळे आणि आतषबाजी फार आवडते; पण आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी करू नयेत. या तिन्ही गोष्टी आवडतात; पण प्रदूषणही वाढवितात. त्यामुळे स्वप्नं, नवीन स्वप्नं आणि नित्यनूतन स्वप्नं हीच आतषबाजी आता आनंद देते आणि आतषबाजीनंतर? स्वप्नपूर्तीचा फराळ! स्वप्नपूर्तीची मेजवानी! स्वप्नापलीकडची दिवाळी!

ज्ञानेश्वर मुळे -
लोकसत्ता
रविवार, २८ नोव्हेंबर २०१०
dmulay@hotmail.com 

Tuesday 12 October, 2010

स्वप्न बघा, स्वप्न जगा


गेल्या दिवाळीत त्रिमितीने  स्वप्न बघा, स्वप्न जगा अंतर्गत  कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार आणि  प्रा.प्रविण दवणे यांच्या विचारांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली होती. या वर्षी दरर्‍याचं सिमोलंघन उमेदीचे शब्द घेऊनच करायचं  असं ठरवलं आहे. या वर्षीचा कार्यक्रम रविवार १७ ऑक्टोबर रोजी दामोदर नाट्यगृह येथे सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास मधुकर तळवलकर, उदय निरगुडकर व गोपी कुकडे हे पाहुणे वक्ते म्हणून येणार आहेत. या दिग्गजांनी आपली स्वप्न कशी सत्यात आणली ते त्यांचाच तोंडून ऎकण्यातच खरी मजा आहे तेव्हा या कार्यक्रमाला जरूर या आणि विचारांचं सोनं लूटा...!

Tuesday 28 September, 2010

ड्रॉपाअऊट की आऊटकम !


करण चाफेकर  या ड्रॉपाअऊट इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याने सर्वात जलद रोबो तयार केला आहे. लोणावळा येथे झालेल्या रोबोलिगा या स्पर्धेत त्याला राज्यातून प्रथम पारितोषिक मिळाले आहे. दुसर्‍या क्रमांकावर आलेल्या रोबोपेक्षा करणचा रोबो सहापट वेगवान होता हे त्याचं आणखी एक वैशिष्ट्य.

चारवर्षांपुर्वी करणच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. त्या काळात घरी असताना वैफल्यग्रस्थ न होता करणने संगणकावर काम सुरू केलं आणि ही असाधारण गोष्ट करून दाखवली.  करण्यासारखं खूप आहे, उमेद मात्र हवी. मिळण्यासारखं ध्येय आहे, जिद्द मात्र हवी हे खरं करून दाखवलं. करणची ही कथा वाचा लोकसत्ताच्या गोष्ट एका इडियटची या लिंकवर.

Friday 23 July, 2010

ब्रेन गेन


हल्लीच्या पिढीत काही राम राहिलेला नाही किंवा सगळी हुशार मुलं डॉक्टर, इंजिनीअर बनली तर हा देश कोण चालवणार?  असे नकारात्मक सूर अनेकदा ऎकायला मिळतात. नव्या जमान्याच्या, नव्या दमाच्या आयाअयटीयन्सनी मात्र या बाबतीत पुढाकार घेतला आहे आणि चांगला पायंडा पाडला आहे. केवळ पैशाच्या मागे न लागता काहीतरी करून दाखवता येईल म्हणून या वर्षीच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अनेकानी सरकारी आणि सार्वजनीक क्षेत्रातील कंपन्यामध्ये नोकरी स्विकारली आहे.

अधिक माहितीसाठी वाचा  आयआयटीयन्सचा सरकारी नोकरीकडे वाढता कल   

Monday 12 July, 2010

तरुणाईला हवे प्रोत्साहन आणि आव्हान


तरुणाई पुढची आव्हाने
काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द तरुणाईत नेहमीच असते, पण त्याला योग्य दिशा दावल्यास त्याचे सकारात्मक परिणाम समोर येतात, अन्यथा ही उर्जा वाया जाण्याचाच जास्त संभव असतो. शाळा कॉलेजं हे तर या उर्जेचे स्त्रोतच. पण हल्ली मैदानी खेळ, स्काऊट-गाईड, एन्.सी.सी. याच प्रमाण/महत्व कमी झालेलं दिसतय. (हे विषय फक्त जास्तीचे मार्क मिळवण्याचे उपचार झालेत.)  श्री. ची.मो.पंडित यांचा एक लेख नुकताच लोकसता मध्ये वाचायला मिळाला. वाचून विचार करण्या सारखा हा लेख स्वप्नपंखच्या वाचकांसाठी.



१९६०-६२ चा काळ- सेनेटर हम्फ्री यांनी परिश्रमपूर्वक एक योजना आखली. नाव होते Peace Corps. उद्देश होता की अमेरिकेतील उत्साही तरुणतरुणींची निवड करून, त्यांना प्रशिक्षण देऊन जगभर मदतकार्यासाठी पाठवायचे. त्याचबरोबर त्यांनी अमेरिकन संस्कृतीची जगभर ओळख करून द्यायची. निवडीचे निकष अतिशय कठोर असत व आठवडय़ाला ५५-६० तास प्रशिक्षण चाले. ज्या देशात जायचं तिथली संस्कृतीही अभ्यासावी लागे. राष्ट्राध्यक्ष केनडी यांनी ती योजना स्वीकारली व अमलात आणली. भारतातही हे ‘पीस कोअर’चे स्वयंसेवक येत. काही स्वयंसेवक एक वर्षांने परत गेले. काही मदतकार्यात रमून गेले. मोठय़ा कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी या तरुणांचा लाभ घेतला. आजही पीस कोअरमध्ये भरती होण्यासाठी तरुणतरुणी रांगा लावतात.अगदी अलिकडे एप्रिल २००९ मध्ये ‘एडवर्ड केनेडी सव्‍‌र्ह अमेरिका अ‍ॅक्ट’ नावाचे बिल त्यांच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्हज्नी स्वीकारले. बिलाचे नाव आहे Generations Invigorating Voluntarism and Education- थोडक्यात GIVE  (नव्या पिढीला स्वेच्छा सेवाकार्य आणि प्रशिक्षण यासाठी प्रोत्साहन देणे) ‘राष्ट्रीय नागरी कम्युनिटी कोअर’, ‘अमेरिकेच्या सेवेत स्वयंसेवक’, ‘राष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक सेवा कोअर’ अशा अनेक योजनांचा त्यात अंतर्भाव आहे. या सर्व योजना १८ ते २४ वयोगटातील तरुणतरुणींसाठी आहेत.
० दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचे तरुण आघाडीवर निघून गेल्यावर शेतीला मनुष्यबळ कमी पडायला लागले. इंग्लंडने ‘भूसेना’ (Land Army) नावाची योजना जाहीर केली. जे युद्धावर गेले नव्हते असे तरुणतरुणी, मध्यमवयीन लोक उत्साहाने त्यात भरती झाले. गटागटाने जाऊन नांगरणी, वखरणी, पेरणीसारखी कामे, कापणी, झोडणी, मळणी करून देणे अशी कामे झाली. आजही भूसेना कार्यरत आहे. जॉन स्टुअर्ट कॉलीस नावाच्या कवी आणि भौतिकशास्त्रज्ञाने पाच वर्षे शेतावर व दोन वर्षे फळबागा आणि जंगलखात्यात काम केले. The Worm forgives the plough नावाचे एक अप्रतिम पुस्तक त्यांनी या अनुभवांवर लिहिले.
० स्वित्र्झलडमध्ये खडे सैन्य नाही. परंतु प्रत्येक नागरिकाला एक वर्षांचा सक्तीच्या सैनिकी शिक्षणाचा अभ्यास पुरा करावा लागतो. शिवाय दर पाच वर्षांनी तीन महिन्यांचा उजळणी, अभ्यास करावा लागतो-अद्ययावत होण्यासाठी. यातून कोणालाही सूट मिळत नाही. मी जर्मनीत शिकत असताना स्वित्र्झलडचे एक प्राध्यापक (४५-५० वयाचे) सांस्कृतिक देवाण-घेवाण कार्यक्रमांतर्गत एक वर्षांसाठी आले होते. मध्येच ते तीन महिन्यांसाठी या उजळणी अभ्यासासाठी जाऊन आले. ही सर्व व्यवस्था इतकी उत्तम आहे की ६-८ तासांच्या पूर्वसूचनेवरून सबंध स्वित्र्झलड रणसंग्रामासाठी सुसज्ज होऊ शकते.
० जर्मनीत नागरी सेवा कायद्यांतर्गत (zivildienst) सर्व तरुणतरुणींना ११ महिने काही ना काही सामाजिक कार्यात सेवा द्यावी लागते. अपंग, निराधारांची सेवा, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, अत्यवस्थ रुग्णांचा आश्रम, मतिमंद प्रौढांचे आश्रम इत्यादी सर्व सरकारी, निमसरकारी संस्थांमार्फत चालविले जातात. तेथे काम करता येते. निर्वासित, स्थलांतरित यांना जर्मन भाषा शिकविणे, त्यांना मदत करून स्वत:च्या पायावर उभे करणे अशीही कामे असतात. हॉस्पिटल्स, म्युझियम्स, टूरिझम अशा ठिकाणीही कामे करता येतात. या सर्व कामांमुळे समाजाचे, आर्थिक प्रश्नांचे एक वेगळेच भान तरुणाईला होते. नोकरीला लागण्यापूर्वी ही एकूण ११ महिन्यांची सेवा कायद्याने बंधनकारक आहे!
० पाश्चात्य देशातील तरुणाईला दिले जाणारे प्रोत्साहन, सामाजिक- आर्थिक परिस्थितीचे भान देणे, त्यांच्या पुढे नवनवीन आव्हाने उभी करणे, त्यांच्या कर्तृत्वाला, पुरुषार्थाला साद घालणे यावरून आपल्यालाही खूप काही शिकण्यासारखे आहे. लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे हे सर्व देश लोकशाहीच्या चौकटीतच काम करत आहेत.
० स्वातंत्र्यानंतर आपल्याकडे एक जाहीर चर्चा झाली. सक्तीचे लष्करी शिक्षण असावे की नसावे, याविषयी. लष्करी शिक्षण म्हणजे नाझीझम- हिटलर आणि अहिंसा, सत्याग्रह म्हणजे शांतता असा भावनिक निर्णय होऊन सक्तीच्या लष्करी शिक्षणाला नकार देण्यात आला. तरीदेखील एन.सी.सी. होती आणि १९५५-६० सालाच्या सुमारास आम्ही कॉलेजमध्ये असताना एन. सी. सी.त खूप रस घेत असू. मी विमानभेदी तोफखान्यात दोन वर्षे भरती झालो. देवळालीचे दोन कॅम्प्स आनंदाने अनुभवले. हल्ली एन.सी.सी.त फारसा कुणी रस घेत नाहीत, असे ऐकतो.
त्याही आधी शाळेत असताना बालवीर-वीरबाला पथके असत. वयाच्या नवव्या वर्षी मी कॅम्पवर तीन दगडांची चूल लावून पहिला स्वयंपाक- पिठलं भात- केला. रोज काहीतरी सत्कृत्य करण्याची चढाओढ असे. आज शेजारच्या आजीला दूध आणून दिले, आज एका अंध मुलाला हात धरून रस्ता ओलांडून दिला अशा नोंदी वहीत करायला कोण आनंद, अभिमान वाटायचा! त्याचदरम्यान राष्ट्रसेवा दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचेही संस्कार होत होते. आता तेही सौम्य झालेत किंवा संपलेत.
सुशिक्षित मध्यम वर्गाच्या, नागरी समाजाच्या वृत्तीच पार बदललेल्या आहेत. डॉक्टर झाल्यावर एक वर्ष शहर सोडून अंतर्भागात, ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा द्यावी अशी अट आहे. या योजनेचे काय झाले? काही वर्षांपूर्वी एक गृहस्थ माझ्याकडे आले होते. त्यांचा मुलगा आय.आय.टी. पवईला शिकत होता. त्याला नियमाप्रमाणे तीन-चार महिने प्रत्यक्ष बांधकामावर राहून अनुभव घेणे अनिवार्य होते. माझ्या ओळखीपाळखीने काही सोय होऊ शकेल का, असे त्यांनी विचारले. मी त्यांना मुलालाच माझ्याकडे पाठवायला सांगून वेळ दिली. तर ते गृहस्थ मुलाला घेऊन स्वत: आले. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून मुलाशी तीन-चार प्रकल्पांविषयी बोलणे सुरू करून त्याचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर  गृहस्थ मध्येच म्हणाले, ‘अहो ही सर्व कामे फार कष्टप्रद असणार ना? उन्हातान्हात राबायचं. खरं तर मी इतके पैसे कमावतो की नातवंडांचीपण सोय केली आहे. काम न करताच तुमच्या ओळखीने दाखला नाही का मिळणार.?’ मला संताप आला. मी त्यांना बाहेर जायला सांगितले. मुलाला म्हणालो, ‘वडिलांचा बाब्या झाला नसशील तर थांब. छान मस्त काम शोधू’, बिचारा वडिलांचे बोट धरून खाली मान घालून निघून गेला.
वरील पाश्र्वभूमीवर एक योजना मनात येते. ती येथे सूत्रक्रमाने मांडत आहे. त्यावर जाहीर चर्चा अपेक्षित आहे.
० नाव- अजून ठरलेले नाही.
० कोणासाठी- १८ ते २१ वयोगटातील तरुणतरुणींसाठी
० शैक्षणिक पात्रता- १२वी पास
० अभ्यासक्रम- १ वर्ष
० पहिले तीन महिने- लष्करी शिक्षण- काही एक. कमीत कमी कामाची शिस्त आवश्यक आहे.
० पुढील चार महिने- एका शेतकरी कुटुंबात राहून नांगरणी, पेरणी, वखरणीपासून ते पिके कापून, झोडपून पोत्यात भरून घरी आणण्यापर्यंत सर्व कामांत सहभाग.
० त्यानंतर तीन महिने- आपत्ती व्यवस्थापन, फर्स्ट एड इत्यादींचे प्रशिक्षण. त्यात Industrial Basic Training (पाबळ)चा समावेश.
० शेवटचे २ महिने- विद्यार्थ्यांच्या आवडीप्रमाणे खालील कोणत्याही विषयाचे प्रशिक्षण. एकूण १२ महिने.
० Red Cross & First Aid; General Ward Service in Hospital; Health, Dietics, Immunization.
० Garden & Nursery training, Preparing Compost & good soil, Plant propagation (seed treatment, Grafting) soil conservation and watershed development.
० Community development, Participation & Organisation. Literacy Campaign, Non conventional domestic energy use (Solar, Biogas, Smokeless Chulhas..) Accounting for voluntary organizations.
या सर्वाचा मूळ उद्देश तरुण पिढीला देशाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीचे भान करून देणे असा आहे. तज्ज्ञ निर्माण करण्याचा नव्हे. हा अभ्यासक्रम पुरा केलेल्यांना पुढील औपचारिक शिक्षणात आणि नोकरीत प्राधान्यक्रम द्यावा. 
असे हे एक वर्ष ‘वाया’ का घालवायचे असा विचार कोणी करेल. एका पालकाने उत्तमरीत्या १२वी  झालेल्या आपल्या मुलीला एक वर्ष भारतातल्या निरनिराळ्या स्वयंसेवी संस्थांत पाठवून अनुभव घेऊ दिला. त्यानंतर विचार करून त्या मुलीने आपला अभ्यासक्रम ठरविला! वर्ष वाया नाही गेले!
LET US INVEST IN YOUTH!

    Saturday 1 May, 2010

    मराठी माणसाला धंदा करता येत नाही' हा आता इतिहास झालाय इती.- मुकेश अंबानी


    मराठी  माणसाला धंदा करता येत नाही, मराठी  माणूस डाऊनमार्केट आहे मराठी  माणसानी चाकरीच करावी अशा शेलक्या शब्दात मराठी माणसांची संभावना गेली अनेक वर्ष मराठी  माणूसच करत आहे आणि त्यामुळेच मग दुसरा कुणीतरी त्याची री ओढतो. पण यावर उपाय काय? मुळात मराठी माणूस तसा आहे काय? तर त्याला उत्तर नाही असचं आहे. हे दुसरं तीसरं कुणी म्हणत नसून मुकेशअंबानीचेअरमन आणि मॅनेजिंगडायरेक्टर, रिलायन्स इंडस्ट्रिजलिमिटेड  यांचं म्हणणं आहे.

    त्यांच्या लेखातील काही ठळक मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. 

     

    • मी जन्माने आणि कर्मानेही पक्का महाराष्ट्रीयच आहे.
    • सौंदर्याची आणि श्रीमंतीची खाण असणा-या या भाषेवर माझेही मनापासून प्रेम आहे.
    • आपली मुंबई हे बॉलिवूड म्हणून ओळखले जाते याचा मला खूप अभिमान वाटतो.
    • भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारा मराठी सिनेमाही आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आहे.
    • आता रिलायन्समध्येही ज्येष्ठ पदांपासून कनिष्ठ वर्गापर्यंत मोठ्या प्रमाणात मराठी माणसे कामकरताना दिसतील
    • 'मराठी माणसाला धंदा करता येत नाही ' हा आता इतिहास झालाय.
    • मराठी माणूस व्यवसायात मागे का? अगदी मनापासून सांगायचे तर हे वाक्य कदाचित काहीदशकांपूर्वी खरंही असेल, पण आज असे चित्र बिलकूलच नाही
    • नव्या ज्ञानाधिष्ठित समाजरचनेमध्ये मराठी माणूस अग्रणी असेल यात मला तरी शंका वाटत नाही. 
    • व्यवसाय करणे हा एका समुदायाची किंवा जातीची मक्तेदारी राहणेच शक्य नाही
    • घराणेशाही आणि समुदायाच्या परंपरेतून मिळणारा व्यवसायाचा वारसा हा फार काळ टिकणार नाही. 
    • महाराष्ट्रातील शिक्षणाची संस्कृती या नव्या युगात उद्योजकतेची कास घेताना मला दिसतेय.
    • महाराष्ट्र हा भक्ती आणि शक्तीचे अद्वैत आहे.

     

    मुकेश अंबानींचा हा संपुर्ण लेख नितीन पोतदार.कॉम वर अवश्य वाचा. अंबानी सारख्या सोनारानेच कान टोचलेत ते बरंझालं पणं याच गोष्टी गेली दोन वर्ष सभा-समारंभातील भाषणातून आणि वृत्त्पत्रातील लिखाणातून कॉर्पोरेट लॉयर नितीनपोतदार  जोरदारपणे सांगत आले आहेत. गेल्या दिवाळीच्या पहिल्याच दिवशी त्रिमितीच्या स्वप्न बघा स्वप्न जगा   याविशेष कार्यक्रमात व्याख्यान देताना त्यानी या सर्वच गोष्टींचा उहापोह केलेला दिसतो. (वाचा: विचारांची आतषबाजी नितीन पोतदार)  सहजच मी पोतदारांच्या लेखांचा धांडोळा घेतला तेव्हा त्यानी सातत्याने मांडलेला मराठीमाणसाविषयीचा दृष्टीकोन आणि कळवला दिसून आला, वानगी दाखल काही दुवे पुढे देत आहे.


    ........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे!


    2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त सहकार्य’ (collaboration)!


    मराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची


    महाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे - नितीन पोतदार


    महाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा


    बिझिनेस नेटवर्किंग’ - मराठी उद्द्योगजगत प्रगतीचा एक्सप्रेस वे!


    सीमोल्लंघन - बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)


    यशासाठी घ्या राईट टर्न


    मराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स!


    मराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे!


    मराठी मिल्लिओलानिअर 



    हे सगळे लेख म्हणजे आपली कर्मभुमीवरची गीताच आहे  तेव्हा वाचा, विचार करा आणि नि:शंक मनाने कामाला लागा.यश आपलच आहे. जय हो...!!!


    विनंती: प्रत्येक वाचकाला विनंती, की त्याने हा लेख किमान ५ मराठी माणसांना तो वाचायला आग्रहाने द्यावा.

    Wednesday 7 April, 2010

    आयआयटीच्या वाटा

    येत्या ११ एप्रिल ला आयआयटी चे प्रवेश परीक्षा होत आहे.  आयआयटीच्या पायर्‍या चढणं म्हणजे पुढे लाखो रुपयांचं पॅकेज मिळवून आयुष्याचं कल्याण होणं असं समिकरण असल्याने देशभारातून लाखो विद्यार्थी ती परीक्षा देतात. या परीक्षेची तयारी करणं मात्र वाटतं तेवढं सोपं नाही आणि म्हणूनच शिक्षणाचा बाजार मांडणार्‍यांसाठी ती आणखी एक संधी आहे. या बाबत पालकांनी काय काळजी घ्यावी हे सांगणारा लोकसत्ता मधला आयआयटी: ड्रीम मार्केट फोफावतेय! हा लेख जरूर वाचा.

    आयआयटीच्या परीक्षार्थींमध्ये कोटा या शहराला खुप मोठ महत्व आहे. ते का ? हे लोकसत्ता मधल्या कोटाची फॅक्टरी.. या आणखी एका लेखामधून आपणास समजेल. 
    Related Posts with Thumbnails