Thursday 29 December, 2011

स्टीव्ह जॉब्स यांनी २००५ साली सत्र प्रारंभ होताना स्टॅनफोर्ड विद्यापिठात केलेले भाषण.





(अनुवाद उदय कुलकर्णी)


जगातील एका सर्वोत्तम विद्यापिठाच्या सत्राचा प्रारंभ होत असताना मी आज इथे उपस्थित आहे हा माझा सन्मान आहे. खरं सागांयचे तर कॉलेज पदवीच्या इतक्या जवळ जाण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. आज मला तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगायच्या आहेत. होय, फक्त तीन गोष्टी, त्यापलिकडे काही नाही. फक्त तीन गोष्टी.

पहिली गोष्ट आहे घटनांचे अर्थ शोधण्याची धडपड करण्याची.

रीड कॉलेजमधून पहिल्या ६ महिन्यानंतरच मी ड्रॉप आऊट झालो. पण नंतर १८ महिने मी तिथेच ड्रॉप-ईन म्हणून राहिलो व मगच पूर्णपणे कॉलेजला राम राम ठोकला. 

माझ्या जन्माआधीपासून याची सुरवात झाली होती. माझी जन्मदात्री आई एक तरूण, अविवाहीत कॉलेज विद्यार्थिनी होती. तिने मला दत्तक द्यायचे ठरवले. ती स्वत: पदवी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती, त्यामुळे तिला अगदी ठामपणे वाटत होते मला कोणा पदवीप्राप्त व्यक्तीनेच दत्तक घ्यावे. माझा जन्म झाल्याबरोबर एक वकील व त्याची पत्नी मला दत्तक घेतील अशी व्यवस्था करण्यात आली होती.  फक्त माझा जन्म झाला आणि त्या जोडप्याने अगदी शेवटच्या घटकेला ठरवले, नाही त्यांना मुलगी हवी आहे.  प्रतीक्षायादीवर जे पुढील जोडपे होते त्यांना मग भर मध्यरात्री फोन करण्यात आला व विचारण्यात आले, “आमच्याकडे एक मुलगा दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहे; तुम्हाला हवा आहे का?” ते म्हणाल, “अर्थातच, हवा आहे.त्यांनी मला दत्तक घेतले.   माझ्या जन्मदात्या आईच्या नंतर लक्षात आले मला दत्तक घेणारी माझी आई कॉलेज पदवीधर नाही तर वडिलांचे तर शालेय शिक्षणही पूर्ण झालेले नाही.  जन्मदात्या आईने दत्तकपत्राच्या करारावर सही करायला नकार दिला. काही महिन्यानंतर माझ्या दत्तक माता-पित्यानीं मला कॉलेजमध्ये पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले तेव्हाच माझ्या जन्मदात्या आईने मला दत्तक द्यायचे मान्य केले. 

आणि १७ वर्षांनंतर मी कॉलेजमध्ये दाखल झालोच.  पण मूर्खपणे, मी स्टॅनफोर्डइतक्याच एका महागड्या कॉलेजची निवड केली.   कामगारवर्गातील माझ्या आई-वडिलांची सगळी बचत माझ्या कॉलेज फीसाठीच खर्च व्हायला लागली.  सहा महिन्यानंतर त्या शिक्षणात मला काही अर्थ दिसेना. आयुष्यात पुढे काय करायचे मला माहित नव्हते आणि कॉलेज शिक्षणाचा काय उपयोग होईल तेही कळत नव्हते.  आणि तरीही मी माझ्या पालकांची आयुष्यभराची सर्व कमाई त्यावर खर्च करत होती. त्यामुळे मी ठरवले आपण ड्रॉप आऊट होऊ आणि होईल सगळे काही ठीक. खरे तर त्यावेळेस ही खूप चिंता करण्यासारखी स्थिती होती. पण आता मागे वळून बघताना वाटतं, मी घेतलेला हा एक अगदी उत्तम निर्णय होता.   ड्रॉप आऊट झाल्याबरोबर मला स्वारस्य नसलेल्या वर्गांना उपस्थित राहणे बंद केले आणि ज्यात मला इंटरेस्ट वाटत होता अशा वर्गांना उपस्थित राहू लागलो. 

अर्थात नंतरचे दिवस खूप सुखाचे व सरळ सोपे नव्हते.   वसतीगृहात खोली नसल्याने मला मित्राच्या खोलीत जमिनीवर झोपावे लागे.   कोकच्या बाटल्या परत करून जे डिपॉजीट म्हणून ठेवलेले पैसे परत मिळत त्यातून मी माझा जेवणाचा खर्च भागवत असे.  आठवड्यातून एकदा तरी भरपेट जेवण मिळावे म्हणून मी दर रविवारी रात्री गावातील हरे कृष्ण मंदिरात जात असे, तेही ७ मैल चालत. पण या अडचणी असूनही मला ही स्थिती जास्त भावत होती.  माझी जिज्ञासा आणि अंत:प्रेरणा जो मार्ग मला दाखवत होते, त्याच दिशेने मी जात होतो. आणि त्या प्रवासात जे माझ्या हाती लागले ते नंतर अतिशय अनमोल ठरले. एक उदाहरण देतो: 

रीड कॉलेजमध्ये तेव्हा कॅलिग्राफीचे एकदम उत्तम शिक्षण मिळायचे.  कॉलेज परिसरातील प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रॉवरवरचं प्रत्येक लेबल हातानी लिहिलेल्या सुंदर कॅलिग्राफीने सजलेले असायचे. ड्रॉप आऊट असल्याने मला आधीच्या विषयांच्या वर्गांना उपस्थित राहण्याची आवश्यकता नव्हती.   मी मग कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहायचे ठरवले.   इथे मला सेरीफ व सॅन सेरीफ टाईपफेसेस म्हणजे काय ते कळले (टीप: अक्षरांच्या टोकांवर रेष देऊन ते ठळक करणे म्हणजे सेरीफ व तसे न करणे म्हणजे सॅन सेरीफ. उदा: मराठी लिहिताना अक्षरांच्या डोक्यावर रेष न काढणे सॅन सेरीफ म्हणता येईल.) तसेच वेगवेगळ्या अक्षरांसाठी मध्ये जागा सोडताना ती कशी कमी जास्त करायची ते कळले. खूप चांगली टायपोग्राफी खूप चांगली कशामुळे होते ते मला कळले. कॅलिग्राफी जणू माझ्यावर मोहिनी घातली.   ते शिकणे छान होते, त्याला ऐतिहासिक संदर्भ होता कलात्मकदृष्ट्या ते इतके तरल होते, विज्ञानाची तत्वांत त्याला जखडता आले नसते. 

यापैकी कशाचाच माझ्या आयुष्यात उपयोग होईल अशी शक्यता नव्हती. पण नंतर दहा वर्षांनी आम्ही आमचा पहिला मॅकिनटॉश संगणक डिझाईन करायला घेतला तेव्हा हे माझ्या उपयोगी पडले. हे सर्व आम्ही आमच्या मॅकमध्ये घेतले.   सुंदर टायपोग्राफी असलेला हा पहिलाच संगणक होता.   जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मॅकमध्ये अनेक टाईपफेस आलेच नसते किंवा प्रमाणबध्द अंतर राखून असलेले फॉन्टही त्यात नसते.  आणि विंडोजने मॅकची फक्त कॉपी केली. बहुधा स्वत:हून अशी सोय करायचे त्यांना सुचले नसते, म्हणजे जगातील कोणत्याच संगणकात ही छान सोय मिळाली नसती. जर मी ड्रॉप आऊट झालो नसतो तर मी कॅलिग्राफीच्या वर्गांना हजर राहिलो नसतो आणि पर्सनल कॉम्पुटरमध्ये आज जी टायपोग्राफीची सुंदर सोय आहे ती मिळालीच नसती. अर्थात मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा यामुळे भविष्यात असा फायदा होईल असा अर्थ लावणे शक्य नव्हते. पण दहा वर्षांनी मागे बघताना मात्र ते सुस्पष्ट होते. 

हा माझा मुद्दा पुन्हा स्पष्ट करतो, पुढे आयुष्यात काय घडेल, त्याचा विचार करत आपण आपल्या आयुष्यात आज घडणार्‍या घटनांची सुसंगती लावू नाही शकत. पण मागे ज्या घटना घडून गेल्या त्या आधारे आपल्या आजच्या आयुष्याचा अर्थ लावू शकता. म्हणजे ज्या घटना घडत आहेत, त्याचा तुमचे भविष्य घडवण्यासाठी पुढे उपयोग होईल असा विश्वास तुमच्यात हवा. तुमची जिद्द, नियती, आयुष्य, कर्म कशावर तरी तुमचा विश्वास हवा. हा दृष्टीकोन असल्यामुळे निराशा कधी माझ्या वाट्याला आली नाही, आणि हा दृष्टीकोन असल्यानेच माझ्या आयुष्यात चांगले, सकारात्मक बदल झाले. 

माझी दुसरी गोष्ट आहे ज्याची आवड आहे तेच आयुष्यात करायला मिळण्याबाबत आणि गमावण्याबाबत. 

मला काय करायची आवड आहे, हे आयुष्यात खुप लवकर मला कळले हे माझे भाग्य.   मी केवळ २० वर्षांचा असताना, माझ्या पालकांच्या गॅरेजमध्ये वॉझ व मी मिळून अ‍ॅपल कंपनी सुरू केली. आम्ही प्रचंड मेहनत केली आणि १० वर्षात एका गॅरेजमधून फक्त आम्हा दोघांच्या बळावर चालणारी ही कंपनी एक मोठी कंपनी बनली चक्क ४००० कर्मचारी असणारी व २ बिलियन डॉलरची कंपनी. आमची सर्वोत्कृष्ट निर्मिती मॅकिनटॉश- एका वर्षाआधी आम्ही बाजारात आणला होता आणि मी ३० वर्षांचा झालो होता. आणि माझी हकालपट्टी करण्यात आली.  जी कंपनी तुम्ही सुरू केली, त्यातून तुमची हकालपट्टी कशी होऊ शकतेसांगतो. अ‍ॅपल जशी वाढायला लागली, आम्ही एका व्यक्तीची नेमणूक केली.  मला वाटले माणुस बुध्दीमान आहे, आम्ही दोघे मिळून कंपनी आणखी मोठी करू. पहिल्या वर्षी सर्व चांगले सुरू होते. पण कंपनीची पुढे वाटचाल कशी असावी या विषयी आमच्या धारणेत नंतर खूप मतभेद होत गेले आणि शेवटी तर ते विकोपाला गेले. संचालक मंडळात त्याच्या बाजूने बहुमत झाले आणि ३०व्या वर्षी मला माझ्याच कंपनीतून बाहेर पडावे लागले. अगदी जाहिरपणे.  माझ्या जाणत्या वयातील आयुष्याचा पूर्ण फोकसच माझ्यापासून हिरावला गेला आणि मी उध्वस्त झालो. 

काही महिने तर काय करावे हेही मला सुचत नव्हते.  उद्योजकांच्या माझ्या आधीच्या पिढीला मी तोंडघशी पाडले आहे, अशी माझ्या मनात अपराधी भावना होती.  मशाल माझ्या हातात दिली जात असतानाच्या क्षणी मी अवसानघात केला आहे असे वाटत होते.   डेव्हीड पॅकार्ड व बॉब नोयसी यांना मी भेटलो व माझ्या या घोळाबद्दल माफी मागायचा प्रयत्न केला.  मी अगदी प्रसिध्द व्यक्ती होतो आणि मी सिलिकॉन व्हॅलीपासून दूर पळून जाण्याचाही विचार केला.  पण हळू हळू मला एक गोष्ट उमजत गेली.   मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते. अ‍ॅपलमधील घडामोडीमुळे त्यात जरासुध्दा बदल झाला नव्हता. मला नकार मिळाला होता, पण माझे प्रेम कायम होते. हा विचार सुचल्यावर मग मी ठरवले पुन्हा पहिल्यापासून सुरवात करायची.   त्या वेळेस माझ्या लक्षात आले नाही, पण अ‍ॅपलमधून हकालपट्टी होणे ही माझ्यासाठी सर्वात उत्तम घटना होती. यशस्वी असण्याचा बोझ माझ्या छातीवरून हटला गेला. नवीन सुरवात करताना कशाचीच खात्री नसते आणि अपयशाच्या भीतीचा दबाव नसतो. एक मुक्तपणा मला अनुभवायला मिळाला. माझ्या आयुष्यातील सर्वात सर्जनशील कालखंडाचा लाभ मला त्यामुळे मिळाला. 

पुढील पाच वर्षात मी नेक्स्ट (NeXT) नावाची कंपनी सुरू केली, पिक्सर नावाची आणखी एक दुसरी कंपनी सुरू केली. आणि एका विलक्षण स्त्रीच्या प्रेमात पडलो, जी नंतर माझी पत्नी झाली. पिक्सरने बनवली, जगातील पहिली कॉम्पुटर अनिमेटेड फिचर फिल्म, टॉय स्टोरी, आणि जगातील सर्वात यशस्वी अनिमेशन स्टुडीओ पिक्सरचा आहे. 

या नंतर काही नाट्यपूर्ण घडामोडी झाल्या, अ‍ॅपलने नेक्स्ट विकत घेतली. मी अ‍ॅपलमध्ये परतलो. नेक्स्टमध्ये जे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले होते, तेच अ‍ॅपलच्या पुनश्च: भरभराटीसाठी कामात आले.  आणि माझी पत्नी लोरीन व मी, आमचे एक आनंदी कुटुंब आहे. 

अ‍ॅपलमधून माझी हकालपट्टी नसती तर यातले काही घडलेच नसते याची मला खात्री आहे. ते एक कटू औषध होते, पण रुग्णाला त्याचीच गरज होती. कधी कधी आयुष्य तुमच्या टाळक्यात एक वीट हाणते. पण विश्वास गमावू नका. मी जे काम करत होतो, ते माझ्या खूप आवडीचे होते आणि त्यामुळेच मी हार न मानता, पुढे जात राहू शकलो या बद्दल मी ठाम आहे. काम हा तुमच्या आयुष्याचा एक फार मोठा भाग असतो.  आणि खूप उत्तम काम करायचे असेल तर, तुम्ही जे काम करत आहात त्याच्या प्रेमात असणे हाच एक मार्ग आहेहे तुमचे असे प्रेयस तुम्हाला अजून मिळाले नसेल तर त्याचा शोध घेत रहा.   तडजोड करू नका.   नातेसंबंधातील प्रेम मिळाले आहे हे जसे तुमच्या ह्यदयातील आवाज तुम्हाला सांगतो, तसेच कामाच्या बाबतीतही ती अनुभूती मिळेल. आणि चांगले नातेसंबंध जसे काळाच्या ओघात अधिकाधिक परिपक्व होत जातात तसे कामाच्या बाबतीतही होईल. त्यामुळे तुमच्या आवडीच्या कामाचा शोध घेत राहा. 

माझी तिसरी गोष्ट आहे, मृत्यूबाबत. 

मी १७ वर्षांचा होतो, तेव्हा एक सुभाषित वाचले होते, ते असे, “प्रत्येक दिवस हा तुमच्या आयुष्यचा जणू शेवटचा दिवस आहे, असे जगलात तर, एक दिवस तुमचा विचार अगदी तंतोतंत खरा ठरणार.या वाक्याचा माझ्यावर प्रभाव पडला आणि त्यानंतर मागील ३३ वर्षे रोज सकाळी मी आरशात बघून स्वत:ला विचारतो, “आज जरा माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असता तर आज मी जे करणार आहे तेच केले असते का?” आणि सलग अनेक दिवस या प्रश्नाचे उत्तर नाहीअसे मिळत गेले तर माझ्या लक्षात येते, काही बदल करण्याची गरज आहे. 

आयुष्यात महत्वाचे मोठे निर्णय घ्यायची वेळ आली तेव्हा, मी लवकरच मरणार आहे याचे भान, मला साहाय्यकारी ठरले. कारण मृत्यू समोर असताना फक्त खरोखरच्या महत्वाच्या गोष्टी तेवढ्या उरतात, बाकी इतर सर्व, इतरांच्या अपेक्षा, तुमचा गर्व, अभिमान, अपयशाची भीती सगळे गळून पडते. आपण कमावलेले गमावून बसू या भीतीने आपण नवे काही करायचा धोका घ्यायला बघत नाही. या दुष्टचक्रात अडकून बसायचे नसेल तर आपण मरणार आहोत याचे भान ठेवणे. शेवटी तुम्ही सर्व गमावणारच आहात, मग तुमच्या ह्यदयाच्या हाकेला प्रतिसाद द्या.

साधारण एका वर्षापूर्वी मला कॅन्सर आहे याचे निदान झाले. सकाळी ०७:३० वाजता स्कॅन केले तेव्हा स्पष्टपणे दिसले माझ्या स्वादुपिंडात ट्यूमर आहे. स्वादुपिंड म्हणजे काय तेही मला माहित नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितले, हा नक्कीच एक असाध्य प्रकारचा कॅन्सर आहे आणि मी फारतर फक्त सहा महिने जगू शकेन. माझ्या डॉक्टरांनी सांगितले, घरी जावून, मी माझी कामे मार्गे लावावीत, अर्थात ते सांगत होते, मी मरण्याची तयारी करावी. जे तुमच्या मुलांना कधीतरी दहा वर्षांनतर सांगावे लागले असे वाटत होते, ते सांगायला फार थोडा अवधी आहे. तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून सर्व व्यवस्था करणे. निरोप घेणे. 

त्या निदानामुळे सर्व दिवसभर प्रचंड अस्वस्थ होतो, मनात खळबळ माजली होती. त्याच दिवशी संध्याकाळी माझि बायोप्सी करण्यात आली. माझ्या घशातून, पोटात, आंतड्यात एंडोस्कोप घालण्यात आला, माझ्या स्वादुपिंडात एक सुई घालून ट्युमरच्या काही पेशी काढून घेण्यात आल्या. मी तर गुंगीत होतो. पण माझी पत्नी तिथे हजर होती. तिने मला सांगितले, डॉक्टरांनी त्या पेशी मायक्रोस्कोपमधून बघितल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण हा स्वादुपिंडाचा एक दुर्मीळ प्रकारचा कॅन्सर, ज्याच्यावर इलाज आहे, असा कॅन्सर असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग माझ्यावर शस्त्रक्रीया करण्यात, आली व आता मी ठीक आहे. 

मृत्यूच्या जास्तीत जास्त जवळ मी इतकाच गेलो आहे आणि आणखी दशके तरी यापेक्षा जास्त जवळ जावे लागणार नाही अशी मला आशा आहे. या अनुभवातून गेल्यानंतर मी तुम्हाला आता खात्रीने सांगू शकतो: 

कोणाचीही मरायची इच्छा नसते. अगदी ज्यांची स्वर्गात जायची इच्छा आहे, त्यांचीही त्यासाठी मरण्याची तयारी नसते. आणि तरीही मृत्यू हे असे अंतिम सत्य आहे ज्याचा आपल्या सगळ्यांना स्वीकार करावा लागतो. तो कोणालाच चुकत नाही. आणि ते योग्यच आहे, कारण मृत्यू हा आयुष्याने लावलेला सर्वात सुंदर शोध आहे. आयुष्यात बदल घडविणारा हा एक दुत आहे. नव्याला वाव देण्यासाठी तो जूने मार्गातून दुर करतो. सध्या हे नवे तुम्ही आहात, पण हळू हळू तुम्ही जुने होणार व तुम्हाला दुर केले जाणार. नाट्यपूर्ण वाटत असले तरी हेच सत्य आहे. 

तुमच्याकडे असलेला वेळ मर्यादीत आहे, आणि त्यामुळे दुसर्‍याचे आयुष्य जगण्यात तो वाया घालवू नका. एका सापळ्यात अडकू नका हा सापळा असतो, दुसर्‍यांच्या तुमच्याबद्दलच्या मतांचा. दुसरे लोक काय विचार करतात, त्याप्रमाणे आयुष्य जगणे हा एक सापळा आहे, त्यात अडकू नका. दुसर्‍यांच्या मता मतांचा जो कोलाहल, त्याच्या गोंगाटापुढे, तुमच्या आतल्या आवाजाला दबू देऊ नका. आणि सर्वात महत्वाचे, तुमचे ह्यदय आणि तुमची अंत:प्रेरण यांनी सुचवलेल्या मार्गावर चालण्याचे धैर्य दाखवा. इतर सर्व गौण आहे. 

मी तरूण होतो तेव्हा द होल अर्थ कॅटलॉगनावाचे एक नियतकालीक प्रकाशित व्हायचे. माझ्या पिढीचे ते जणू बायबल होते. स्टीवर्ट ब्रॅन्ड नावाची व्यक्ती त्याची निर्मीती करायची. त्याच्या जादूई स्पर्शाने तो ते खूप छान बनवायचा. ही १९६०च्या दशकाच्या शेवटीची बाब आहे. तेव्हा पर्सनल कॉम्पुटर आणि डेस्कटॉप पब्लिशींग नव्हते. त्यामुळे ते प्रकाशित केले जायचे, टाईपरायटर, कात्र्या आणि पोलराईड कॅमेरा यांच्या साहाय्याने. गुगल येण्याआधी ३५ वर्षे जणू ते पुस्तक स्वरूपातील गुगल होते: माहितीने ओतप्रोत भरलेले, छान असायचे. 

स्टीवर्ट आणि त्याच्या सहकार्‍यांनी द होल अर्थ कॅटलॉगचे अनेक अंक प्रकाशित केले. मग त्याची उपयुक्तता कमी झाल्यावर १९७०च्या दशकाच्या मध्ये त्याचा शेवटचा अंक काढला. त्यावेळेस मी तुमच्याच वयाचा होतो. या शेवटच्या अंकाच्या मागील पृष्ठावर एक फोटो होता. एका गावाकडे जाणार्‍या रस्त्याचे एक सकाळचे दृश्य. तुम्ही साहसी असाल तर अशा ठिकाणी प्रवासास जाल, तेव्हाचे दृश्य. त्या फोटोखाली लिहिले होते, “असंतुष्ट रहा, चक्रम रहा स्टे हंग्री, स्टे फूलिश.हा त्यांचा निरोपाचा संदेश होता - स्टे हंग्री, स्टे फूलिश. आणि मी स्वस्त:साठी नेहमी तीच अपेक्षा केली आहे. आणि आता पदवी मिळवून तुम्ही एक नवी सुरवात करणार आहात, तेव्हा मी तुमच्यासाठीही तीच अपेक्षा करतो.

स्टे हंग्री, स्टे फूलिश. 

धन्यवाद. 

स्टीव्ह जॉब्ज, सीईओ अ‍ॅपल कॉम्पुटर

1 comments:

Sangram Nandkhile said...

Well done. Good work. have seen the original speech & felt awesome while reading it in marathi.

Thanks a lot.

Post a Comment

Related Posts with Thumbnails